Tuesday, December 15, 2015

सहकारी

माझा असा समाज होता की माझ्या सगळ्या सहकार्याचं आयुष्य आणि अनुभव साधारणपणे माझ्याच सारखे असावेत. पण ते काही खरं नाही, तो मोठा गैरसमज होता. अगोदरच्या नोकरीत माझ्या शेजारी बसून काम करणारा पूर्वी चौकात चादर टाकून ट्यारो कार्ड वाचायचा. आणि आता प्रोग्रामिंग करतो. एक जण एक्सीडेंट मध्ये गेलेले व्यक्तींचे प्रेत मॉर्ग मध्ये टाकण्यापूर्वी धुवून काढायची नोकरी करायचा. पण सगळ्यात भयंकर म्हणजे एक सहकारी बाई बर्लिन जवळ पूर्व जर्मनीत एका खेडेगावात शेतात काम करत होती. त्या खेड्यात जेमतेम ३०० जण. त्या सगळ्यांनाच त्यांच्या जगण्याचा वीट आला होता अन त्यांना भुयारातून पश्चिम जर्मनीत पळून जायचं होतं. पण तसं बोलायचीही चोरी होती. कारण त्यातले खूप जण सरकारी खबरी होते. त्यामुळे असं पळून जायचा मनसुबा बोलुन दाखवणारे रातोरात पकडले जायचे अन पुढे त्यांची कधीच काही खबर यायची नाही. पोलिसांना खबर देणारे कोण हे कळायचं नाही पण तिच्या मते कुणाचा भाऊ अन काका वरही विश्वास ठेवता यायचा नाही. या मानानी माझं आयुष्य अगदी सरळ सुतासारखंच समजायचं.

आप्तेष्टाच्या भल्यापेक्षा कुणाला देशाची जुलमी राजवट टिकवण महत्वाचं वाटाव हे खूपच दुर्दैवी आहे.  एका दृष्टीनी आपल्याला काय महत्वाचे आहे हे ठरवण किंवा शोधून काढण फार चांगले आहे. मला फेमिली सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. कुणाला देश महत्वाचा वाटत असेल, कुणाला समाज, कुणाला विज्ञान, कुणाला त्यांचा धर्म अन कुणाला आणखीन काही. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नसावं, ते ज्यांचे त्यांनी ठरवावे. फक्त एकदा ते उमगलं कि त्या मागे स्वताला झोकून देता यायला हवं. सोयीप्रमाणे ते रोजच्यारोज बदलायला नको, अन त्यात ढोंगीपणा असू नये कारण त्यात बरोबर किंवा श्रेष्ठ किवा चूक असं काही नाही.  एकदा स्वतःपेक्षा आपण कशाला महत्व देतो हे कळलं कि जगण्याला एक दिशा मिळते अन दैनंदिन जीवनात कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवं अन कुठल्या गौण ते सहज ठरवता येतं.

मला फेमिली / कुटुंब सर्वात महत्वाचं वाटतं अन आपल्या संस्कृतीत तसे काही उदाहरणं आढळतात पण नेहेमीच तसं  घडलं असं नाही. पुंडलिकांनी विठ्ठलाला विटेवर उभा केला म्हणजे देवापेक्षा त्याला वडील महत्वाचे, अन ते विठ्ठलालाहि आवडलं. भगवान श्रीराम स्वतःच्या वडिलांचे वचन पाळण्याकरता वनवासात गेले, त्यांना ते इतर सर्वापेक्षा जास्त महत्वाचे होते. आताच्या काळात बऱ्याच देशात कुणाला स्वतःच्या नवरा वा बायको विरुद्ध साक्ष देण्यास भाग पडू नये असा कायदा आहे. पण कायदा किंवा समाज काय म्हणतो त्यापेक्षा स्वतःला काय पटत ते महत्त्वाच आहे. शिवाय हिंदू तत्वज्ञान  इतर धर्मापेक्षा  उदार मतवादी असल्यामुळे त्यात कुठले कडक नैतिक नियम-निर्बन्ध नाहीत; ज्याचा मार्ग त्यांनी निवडावा अन त्याप्रमाणे करावं ते भरावं हे खूप चांगलं तत्व आहे.

No comments:

Post a Comment